yuva MAharashtra About us

About us

 मिरज सुधार समितीची वाटचाल...


रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेले मिरज शहर हे ऐतिहासिक शहर आहे. हजरत ख्वॉजा शमनामिरा (र.ह.) आणि श्री गणेशाची नगरी म्हणून मिरज शहराचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मिरज शहर वैद्यकीय पंढरी म्हणूनही ओळखली जाते. मिरज रेल्वे जंक्शन, वैद्यकीय पंढरी, संगीताचे माहेरघर, हजरत मिरासाहेब दर्गा, ऐतिहासिक श्री गणेश मंदिर, जेष्ठ कलाकार बालगंधर्वांची जन्मभूमी, संगीतकार ख्वॉ अब्दुलकरीम ख्वॉंची कर्मभूमी असे वैशिष्ट्य असलेल्या सुमारे १४०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असूनही मिरज शहराचा अपेक्षित विकास झाला नाही.

त्याला अनेक कारणे आहेत. मिरज-सांगली असा पूर्वगृह दुषित वातावरण तयार करून मिरजेला कायम दुय्यम स्थान देण्याची जिल्हा व राज्यस्तरीय नेत्यांची भुमिका, मिरजेतील स्वातंत्र्यानंतर मिरजेतील राजकीय कारभाऱ्यांची गळचेपी व आपलीची पोळी भाजून घेण्याची प्रवृत्तीमुळे मिरज शहर हे विकासाबाबतीत मागासच राहिले.

सर्व नैसर्गिक साधनसामुग्री असताना सुध्दा मिरजेचा अपेक्षित विकास झाला नाही. म्हणून  सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. ए. ए. काझी यांच्या पुढाकाराने मिरज शहरातील धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचारसरणीचे कार्यकर्ते  एकत्र आले. या कार्यकर्त्यांनी मिरज शहराच्या विकासासाठी काही तरी सकारात्मक काम करण्याचा निर्धार केला. यातून २६ जानेवारी २००५ साली मिरज सुधार समिती या नावाने सामाजिक चळवळ सुरू केली.

मिरज सुधार समितीच्या माध्यमातून मिरज रेल्वे जंक्शन, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयांचा विकासासाठी तसेच मिरज शहरातील प्रलंबित विधायक प्रश्न  आणि नागरी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मिरज सुधार समितीची सामजिक चळवळ सुरू झाली.

समितीने आंदोलन व पाठपुरावाच्या माध्यमातून अनेक प्रश्न  मार्गी लावले आहेत. हे समाजहितार्थ काम करताना समितीच्या कार्यकर्त्यांना अनेक वेळा सत्त्ताधाऱ्यांचे तसेच प्रशासनाचे रोष सुध्दा पत्करावे लागले. तरीही, कार्यकर्ते न डगमगता मिरज शहराच्या विकासासाठी सामाजिक चळवळ सुरूच ठेवली.

पुढे मिरज सुधार समितीला कायदेशीर स्वरूप येण्यासाठी २६ जानेवारी २००९ साली मिरज शहर सुधार समितीची रितसर नोंदणी करून घेण्यात आली. त्यानंतर समितीचे कार्यकर्ते मिरज शहरासह उपनगरात जोमाने कामास लागली. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी घालून दिलेल्या घटनेला आदर्श मानून समितीचे कामकाज पुर्णपणे लोकशाही मार्गाने चालते. समितीचे अध्यक्षासह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड लोकशाही मार्गाने होत असल्याने समितीच्या माध्यमातून बहुजन व अल्पसंख्यांक समाजातील अनेक युवा अभ्यासू कार्यकर्ते घडले व घडत आहेत.  

सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, कला व क्रीडासह सर्वच क्षेत्रात मिरज शहरासह ग्रामीण भागाची प्रगती करणे हाच मिरज सुधार समितीचे एकमेव ध्येयाने समितीची वाटचाल गेल्या २० वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे.